**विशेष प्रतिनिधी**
**बुलढाणा :** शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसेच हक्काचा पीकविमा मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते **रविकांत तुपकर** यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ते **दि. १५ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला** बसणार असल्याची घोषणा केली आहे.
यासंदर्भात रविकांत तुपकर यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देताना, “**सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी मी उद्या १५ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे. जीव गेला तरी बेहत्तर, पण आता थांबायचं नाही**,” असा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात झालेली वाढ, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यात यावी तसेच पीकविमा योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
**“जीव गेला तरी बेहत्तर, पण आता थांबायचं नाही,”** या निर्धारासह सुरू होणाऱ्या या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
