प्रशासनाकडून भगिनींच्या मागणीची दखल; ‘लाडकी बहीण’ योजनेतील तांत्रिक त्रुटी दूर होणार, सौ. राधाबाई कामारकर यांनी मानले आभार
यवतमाळ / प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सौ. राधाबाई भीमराव कामारकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत, शासनाने ई-केवायसी (e-KYC) माहितीमध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशासनाच्या या संवेदनशील निर्णयाबद्दल सौ. राधाबाई यांनी समाधान व्यक्त करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
या योजनेअंतर्गत अनेक पात्र महिलांना तांत्रिक कारणांमुळे किंवा अर्जातील चुकीच्या पर्यायांच्या निवडीमुळे लाभापासून वंचित राहावे लागले होते. ही बाब सौ. राधाबाई कामारकर यांनी पत्राद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. ई-केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे पोर्टलवर माहिती अपडेट होत नसल्याने लाखो भगिनींचे अनुदान रखडले होते. यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली होती.
महिला व बाल विकास विभागाने या निवेदनाची तत्परतेने दखल घेत ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन शासन परिपत्रक प्रसिद्ध केले. यानुसार, ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ई-केवायसी केली होती, परंतु माहिती भरताना तांत्रिक चुका झाल्या होत्या, त्यांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली माहिती सुधारता येणार आहे. यासाठी पोर्टलवर आवश्यक बदल करण्यात आले असून महिलांना ही माहिती पुन्हा एकदा अचूक भरण्याची संधी देण्यात आली आहे.
या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना सौ. राधाबाई कामारकर म्हणाल्या, “प्रशासनाने महिलांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तातडीने निर्णय घेतला, ही आनंदाची बाब आहे. ई-केवायसीमधील दुरुस्तीच्या संधीमुळे अनेक गरजू महिलांना त्यांचा हक्क परत मिळणार आहे. महिलांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते.”
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
