भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण दिल्ली ला झाले मात्र बाबासाहेबांच्या विशाल कार्यामुळे त्यांचे स्मारक दादर च्या समुद्र किनारी उभारण्यात आले तेव्हा पासून मुंबईत ६ डिसेंबर ला जग भरातून सुमारे पन्नास लाखाच्या जवळपास अनुयायी आंबेडकरी जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्या साठी येतो जणू दर्या किनारी भिम सागर उसळतो…!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी निळे ध्वज फडकावीत दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. डोक्यावर निळा फेटा, पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेले अनुयायी एकच टोला भीमटोला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आशा घोषणा देत 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. शनिवारी तर अख्खी मुंबईच ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून जाणार आहे.
5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच महामानवाच्या दर्शनासाठी आंबडकरी अनुयायींनी रांगा लावल्या आहेत. त्यांच्यासाठी चैत्यभूमी समिती, मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाने अनुयायींची चोख व्यवस्था केली आहे. रांगेतील अनुयायींची गैरसोय होऊ नये, म्हणून महापालिकेने तात्पुरते छत असलेली १५० बाकडी जागोजागी ठेवली आहेत. त्यामुळे वयोवृृद्ध, अपंग यांच्यासह थकलेल्या अनुयायींना तेथे विश्रांती घेता येणार आहे.
चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन झाल्यानंतर अनुयायींची पावले शिवाजी पार्क मैदानाकडे वळतात. त्यामुळे येथे बाबासाहेबांच्या विविध विषयांवरील पुस्तके, ग्रंथांचे स्टॉल्स लागले आहेत. यासह बाबासाहेबांची छायाचित्रे, पुतळे यांचेही स्टॉल्स लागले आहेत. स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, शासकीय व खासगी कार्यालय यांच्यावतीने मोफत जेवण, पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे.
राज्यभरांतून आलेल्या या अनुयायींनी शिवाजी पार्कमधील मंडपात आसरा घेतला आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी येथे विसावा घेतला असून ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादनासाठी ते आतुरलेले आहेत. सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनीही नियोजन केले आहे. अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे, मेट्रोसह बेस्ट प्रशासनानेही खास व्यवस्था केली आहे.
