वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष
शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी
आर्णी नगर परिषदेकडून अलीकडेच लावण्यात आलेल्या वाढीव गृहकरामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अन्यायकारक व अवाजवी कर वाढीविरोधात नागरिकांनी एकत्र येत शेकडो तक्रारी नगर परिषदेकडे दाखल केल्या आहेत. या तक्रारींवर 29 डिसेंबर रोजी भारती शाळेजवळील ज्ञानमंदिरात सुनावणी ठेवण्यात आली आहे.
मात्र, स्थायी समिती गठीत झाल्यानंतरच या तक्रारींवर सुनावणी घ्यावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थायी समिती नसताना घेतलेली सुनावणी ही केवळ औपचारिक ठरेल आणि जनतेच्या तक्रारींना न्याय मिळणार नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
नगर परिषद प्रशासनाने जनभावनांकडे दुर्लक्ष करून आठेमूठपणाची भूमिका घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाचा हा अडेलतट्टूपणा भविष्यात जनतेच्या अंगलट येऊ शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान, वाढीव गृहकरामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय तसेच व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, प्रशासनाने तातडीने कर वाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
——————————————
स्थायी समिती गठीत झाल्यानंतर सुनावणी घ्या
“जनतेवर अन्यायकारक गृहकर लादून प्रशासन जबरदस्ती करत आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसताना सुनावणी घेणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. जर सुनावणी पुढे ढकलून ती स्थायी समिती गठीत झाल्यानंतर आली नाही, तर जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
गणेश हिरोळे
माजी आरोग्य सभापती
