भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
आ. बाळासाहेब मांगुळकर
यवतमाळ ( प्रतिनिधी )
आधीच समस्याग्रस्त असणाऱ्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न अलिकडच्या दशकात अधिक भीषण आणि गंभीर झाले आहेत. भटक्या विमुक्त जमातींचे जगण्याचेच प्रश्न निर्माण झाले आहेत. भटका विमुक्त समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने देश आणि राज्य प्रगतीशील झाले असे म्हणता येणार नाही. या समूहाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. ते स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृहात आयोजित भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत वंजारे म्हणाले, महाराष्ट्रातील शिक्षणाची एकूण स्थिती गंभीर असली तरी भटक्या विमुक्तांची शैक्षणिक अवस्था अधिक वाईट आहे. भटका विमुक्त समाज शिक्षणात अग्रेसर झाल्याशिवाय भटक्या विमुक्त जमातींची प्रगती होणार नाही. त्यासाठी समाजाने संघटीत होऊन आणि संघर्ष करून आपले हक्क पदरात पाडून घ्यावे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज गीरी, गुलाबराव सोळंके यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनिल सोळंके, राजु शिरस्कार, प्रविण गिरी, पुजा वानखेडे, संगिता पुरी, योगिता लेनगुरे, रिता वाडेकर, श्रीराम दौलतकार, मारोतराव जाधव, अंबादास मारोडकर, गजानन पवार, सुनील पवार, ओम सोलंकी, भारत मारोडकर, मनोज पवार, उमेश अजमिरे, राजेश चव्हाण, सुभाष सोळंके, लक्ष्मण सोळंके, चंद्रकांत गीरी, पुष्पलता भारती, सौरभ गीरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता पवार यांनी तर सूत्रसंचालन जनार्दन मोहिते यांनी केले.
