डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक
डॉ. सविता कांबळे
मुक्तमंथन वाचक लेखक मेळावा उत्साहात
अमरावती ( प्रतिनिधी)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे डिजिटल संस्कृतीचा उदय झाला असून वाचन संस्कृती लोप पावत आहे. लेखन आणि वाचनाची परंपरा खंडित झाली आहे. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीला बळ द्यायचे असेल तर वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. सविता कांबळे यांनी केले. त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिमटेकडी येथे आयोजित त्रैमासिक मुक्तमंथन वाचक लेखक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर उद् घाटक डॉ. नितीन कोळी, प्रमुख अतिथी म्हणून गौतम ताराराम, प्रशांत वंजारे, स्वागताध्यक्ष विलास साखरे आदी उपस्थित होते.
आयोजनाची भूमिका डॉ. चंद्रकांत सरदार यांनी मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जलदा ढोके यांनी तर आभारप्रदर्शन संपादक सुनंदा बोदीले यांनी केले.
उद् घाटक डॉ नितीन कोळी म्हणाले, आरक्षण सर्वार्थाने संकटात असण्याचा हा काळ आहे. पुर्वीपासून आरक्षणाचा विरोधी असणारा वर्ग आज यशस्वी होतांना दिसत आहे. क्रिमीलेअर आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भात न्यायालयाच्या भूमिका आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत.
साहित्य संमेलनाचे स्वरूप असणाऱ्या आणि दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार तर चित्रकार बळी खैरे यांना प्रा. सतेश्वर मोरे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद संपन्न झाला ज्यामध्ये प्रा. प्रदिप लोहकरे, गजानन लोहवे यांनी सहभाग घेतला. नारायण जाधव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. समारोपीय सत्रात डॉ. सीमा मेश्राम, डॉ. वामन गवई, कुंदाताई सोनुले आदी मान्यवर सहभागी झाले होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विद्या पाटील, वंदना धवणे, खुशाल ढवळे, अतुल कुमार गवई, हेमंत सावळे आदींनी परिश्रम घेतले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ज्ञानाच्या विस्ताराऐवजी केवळ माहितीच्या आदानप्रदानाला महत्व प्राप्त झाले आहे. ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी ज्ञानार्जनाची नितांत गरज आहे. हे ज्ञानार्जन घडून येण्यासाठी मुद्रित माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मुक्तमंथन हे त्रैमासिक मराठी आणि हिंदी भाषेत वैचारिक जागृतीचा मुक्त मंच म्हणून पुढे आले आहे.
– प्रशांत वंजारे
