अरुंद रस्ता, बेकायदेशीर लाईट्स; मुक्रामबाद मार्ग नागरिकांसाठी धोक्याचा
देगलूर प्रतिनिधी,दि.२०:- मुक्रामबाद–देगलूर हा महत्त्वाचा मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
अरुंद रस्ता, ठिकठिकाणी खड्डे, कोणतीही योग्य सूचना व्यवस्था नाही आणि त्यात भर म्हणून रात्रीच्या वेळी धावणारी वाहने लावतात अत्याधुनिक, अति प्रखर व बेकायदेशीर हेडलाईट्स. परिणामी वाहनचालकांचे डोळे दिपतात, क्षणात दृष्टी हरपते आणि अपघात अटळ ठरतो.
नुकताच या रस्त्यावर गंभीर अपघाताची घटना घडली असूनही प्रशासन ढिम्म आहे.
यापूर्वी नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते, मात्र आंदोलनाचे पडसाद निवळताच सर्व यंत्रणा गप्प बसल्या. आजतागायत कोणतेही गतिशील काम सुरू न होणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळच असल्याचा आरोप होत आहे.
प्रशासन, नेते आणि राजकारणी सर्वच मौनात
नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते व राजकारणी केवळ निवडणुकीपुरते रस्त्याचे प्रश्न मांडतात, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
जनतेच्या करातून उभ्या असलेल्या यंत्रणा नेमक्या कुणासाठी काम करतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
रात्रीच्या वेळी विशेष पोलीस कारवाईची जोरदार मागणी
या मार्गावरून जाणाऱ्या ऑटो,कार खासगी बस,प्रवासी वाहने,ट्रॅव्हल्स,खासगी कार यांच्यावर बसवलेले बेकायदेशीर, बदललेले, अति तेजस्वी हेडलाईट्स तात्काळ काढून टाकून संबंधित वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
मोटार वाहन कायदा केवळ पुस्तकातच मर्यादित राहणार की प्रत्यक्षात अंमलात येणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्या अनुषंगाने रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा देखील येथील प्रवासी नागरिकाकडून करण्यात येत आहे.
मुक्रामबाद–देगलूर रस्त्याची तातडीने दुरुस्ती व
रुंदीकरण अपघातप्रवण ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक ही कामे त्वरित सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभागांवर राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.
