“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात
यवतमाळ,दि.७ फेब्रुवारी…
यवतमाळ शहरातील कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर असल्याने प्रभाग क्रमांक १० मध्ये कचरा उचलला जात नसल्याचे चित्र दिसून आले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी थेट मैदानात उतरून स्वतः ई-रिक्षा चालवत कचरा संकलन केले व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
विशेष म्हणजे यवतमाळ नगरपालिकेवर प्रशासक राज संपून भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊनही शहर स्वच्छ व सुंदर होण्याऐवजी अस्वच्छतेकडेच वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.कचरा संकलनाचा ठेका मिळालेल्या ठेकेदारांवर नगरपालिकेचा कोणताही प्रभावी अंकुश नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.ठेकेदारांकडून कामगारांची नियमित उपस्थिती,वेळापत्रकानुसार कचरा उचल,ई-रिक्षांचे रोजचे फेरे,गणवेश व ओळखपत्रांची अंमलबजावणी,तसेच स्वच्छता नियमांचे पालन केले जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्वच्छ भारत अभियान,महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम तसेच कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घराघरातून दररोज कचरा संकलन करणे,ओला-सुका कचरा वेगळा गोळा करणे,कर्मचारी नियमित हजर ठेवणे व ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे.मात्र प्रत्यक्षात या सर्व नियमांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
डॉ. नीरज वाघमारे यांनी “नगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही.ठेकेदार,अधिकारी व कामगार यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करून नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे,अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला आहे.
ही घटना म्हणजे केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण यवतमाळ शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
