बाजारपेठेच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपायाची गरज!
आर्णी बसस्थानकावर दुचाकी पार्किंग उभारण्याची पत्रकार सद्दाम शेख यांची मागणी
आर्णी : शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे बाजारपेठ परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मुख्य बाजारपेठेकडे जाण्यासाठी एकच प्रमुख रस्ता उपलब्ध असल्याने सकाळी आणि सायंकाळी नागरिकांना अक्षरशः वाहतुकीच्या कोंडीत अडकावे लागते. या समस्येवर तोडगा म्हणून आर्णी बसस्टॅण्ड येथे स्वतंत्र दुचाकी पार्किंगची उभारणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या बसस्थानक परिसरात आणि बाजारपेठेच्या रस्त्यावर दुचाकी वाहने अनियमितपणे उभी केली जातात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते.
जर बसस्थानक परिसरात नियोजनबद्ध टू-व्हीलर पार्किंग तयार करण्यात आले, तर बाजारपेठेत अनावश्यक वाहनांची गर्दी कमी होईल. वाहनचालकांना सुरक्षित जागा मिळेल आणि मुख्य रस्त्यावरील ताणही हलका होईल. यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
पत्रकार सद्दाम शेख व नागरिकांचे म्हणणे आहे की नगरपरिषद आणि वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने निर्णय घ्यावा. शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता, नियोजित पार्किंग ही आता केवळ सोय नसून अत्यावश्यक गरज बनली आहे.
आर्णी शहराची बाजारपेठ ही शहराचे हृदय आहे. मात्र वाढत्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. एकच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आर्णी बसस्टॅण्ड येथे नियोजनबद्ध टू-व्हीलर पार्किंग उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
नगरपरिषद आणि संबंधित प्रशासनाने या विषयावर लक्ष द्यावे . योग्य पार्किंग व्यवस्था झाली तर बाजारपेठेतील ट्राफिक मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अपघातांचाही धोका आटोक्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय तातडीने घ्यावा.”
*पत्रकार सद्दाम शेख*
