निफाड तालुका प्रतिनिधी : गौरव ठाकरे
निफाड:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन निफाडचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पीएम-किसान योजनेत पारदर्शकता वाढविणे तसेच केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने अथवा पीएम-किसान मोबाइल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. याशिवाय ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ई-केवायसी न केल्यास पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निफाड तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी करून शासनाच्या योजनेचा लाभ अविरतपणे मिळवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
