Bol Maharashtra
बिना केटेगरी

यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला प्रचंड जनसमर्थन

यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या मागणीला दिवसेंदिवस व्यापक जनसमर्थन मिळत असून ही मागणी आता लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. सेवा भावी संस्था, ग्रामपंचायती, शेतकरी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे.

 

### ग्रामपंचायतींकडून ठरावांना सुरुवात

 

रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी आर्णी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अधिकृत ठराव मंजूर करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत पोहोंडुळ, जवळा, भंडारीशी, अंतरगाव, तीवरंग, दहिसावळी, म्हसोला (का.), ब्राम्हणवाडा, कुऱ्हा डूमणी, परसोडा आणि लोणबेहेळ यांनी यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वे मार्गाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केले आहेत.

 

या ठरावांबद्दल संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव आणि गावकऱ्यांचे रेल्वे कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

 

### लोकचळवळीत रूपांतर

 

“गाव करी ते राव न करी” या उक्तीप्रमाणे काही मोजक्या नागरिकांनी सुरू केलेला हा उपक्रम आता मोठ्या लोकचळवळीचे रूप घेत आहे. आर्णी शहर व तालुक्यातील सर्व स्तरांतून या मागणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे कृती समितीचे मनोबल अधिक बळकट झाले आहे.

 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी मांडली असून आमदार राजू तोडसाम यांनीही या विषयाची दखल घेतल्याने मागणीला अधिक वेग मिळाला आहे.

 

### गुड मॉर्निंग ग्रुपचा आगळावेगळा पाठिंबा

 

दररोज सकाळी पदभ्रमण करून आरोग्य जनजागृती करणाऱ्या आणि विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या गुड मॉर्निंग ग्रुपने व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत जनजागृती करत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल रेल्वे कृती समितीने त्यांचेही आभार मानले आहेत.

 

### पत्रक व प्रस्तावित नकाशाची चर्चा

 

रेल्वे मार्गाचे संभाव्य फायदे जनतेपर्यंत पोहोचविणारे माहितीपूर्ण पत्रक राजू नालमवार यांनी तयार केले असून अभियंता सागर घोडेराव यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाचा आकर्षक नकाशा तयार केला आहे.

 

### एकविरा संस्थेकडून पुढाकार

 

प्रस्तावित रेल्वे मार्गालगत असलेल्या एकविरा देवी देवस्थान परिसराच्या विकासासाठी कार्यरत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम हिवरेकर यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या पुढाकारातून १४ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

### कृषी उत्पन्न बाजार समितीचेही समर्थन

 

हा रेल्वे मार्ग शेतकरी हिताचा असल्याचे सांगत कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्णीचे सभापती अनिल आडे यांनी समर्थनाचा ठराव रेल्वे कृती समितीकडे सुपूर्द केला आहे. याबद्दल समितीने सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सचिव आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्वसमावेशक असलेल्या या रेल्वे मार्गाच्या मागणीला समाजातील विविध घटकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून प्रसारमाध्यमेही या जनआंदोलनाला सक्रिय सहकार्य करत आहेत.

Related posts

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

तळणी येथे रमजान ईद आनंदात व उत्साहात साजरी

bol maharashtra

पुरातन सिद्धेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक आरास व रोषणाई, महा आरती संपन्न..

bol maharashtra